जर आपण प्राचीन इतिहासाकडे सहजपणे नजर टाकली तर ह्या देशाची सहस्रावधी सुवर्णपाने आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, प्रचंड साहसाने लिहिणाऱ्या हजारो तरुण-तरुणींची यादी पहावयास मिळते. ज्याप्रमाणे महाभारतापासून ही उदाहरणे आपल्याला दिसतात त्याप्रमाणे ऐतिहासिक कालावधीत सुद्धा पहावयास मिळतात.
हरिहर बुक्क आणि त्यांचे गुरु विद्यारण्य यांना स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. शिवाजी महाराज व त्यांचे मावळे तानाजी, जीवा महाला, संभाजी, येसाजी यांच्या मरणाने तर मृत्यूलाही प्रेरणा मिळाली. जीवाची बाजी खेळलेले, स्वातंत्र्याची मशाल खेळलेले असे राजाराम महाराज यांची कारकीर्द तर ‘न भूतो न भविष्यति’ आहे. सर्व हाल-अपेष्टा सहन करणारे खंडो बल्लाळ, रघुनाथपंत हणमंते. औरंगजेबाचे दफन ह्या महाराष्ट्र भूमीत करणारे महाराणी ताराबाईचे श्रेष्ठ सेनापती संताजी, धनाजी ह्यांचे कार्य इतिहासात सोनेरी पानांत लिहिले आहे.
दिल्लीच्या गादीची अपेक्षा करणारे थोरले बाजीराव, वसईचा संग्राम करणारे चिमाजीअप्पा. अटकेपार झेंडा रोवणारे राघोबादादा पेशवे, “बचेंगे तो और भी लढेंगे” याचा नारा लावणारे दत्ताजी शिंदे ह्या लोकांनी स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास लिहिला आहे. अशा ह्या ऐतिहासिक परंपरेप्रमाणे अन्य क्षेत्रातही आपल्या प्रयासाने, साहसी प्रयत्नाने जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्जवल केले आहे.
बुद्धिबळाच्या पटावर आपले नाव उज्ज्वल करणारा विश्वनाथन आनंद, एव्हरेस्टवर झेंडा रोवणारे संतोष यादव, सचिन तेंडूलकर, धावपटू पी.टी. उषा ह्याप्रमाणे कार्य करणाऱ्यांची यादी काही कमी नाही. ब्रिटिशांच्या विरुद्ध सशत्र क्रांती करणारे मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ह्या आदर्श लोकांमुळे आपण ताठ मानेने स्वातंत्र्यात वावरतो.
कर्तृत्वाला दाही दिशा मोकळ्या असतात. उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, चौगुले अशा एक ना अनेक आघाडयांवर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणारे लोक या भारतभूमीत जन्माला आले.
गलिच्छ राजकारणाच्या नादी लागून एकमेकांची डोकी फोडण्यात धन्यता मानणारे भन्नाट वेगाने गाडी चालवताना स्वतःचा आणि इतरांचा जीव घेणारे कॉलेज तरुण, आपल्या अंगावर कमीतकमी वस्त्रे परिधान करून विकारांना आव्हान देणाऱ्या युवती हे लोक देशाचे नाव काय अजरामर करू शकतील ? कोणता इतिहास लिहू शकतील ? आपल्या वैभवशाली इतिहासाकडे पाहून आपण काय करीत आहोत, याचा कधी विचार केला आहे का ? ह्या देशात सर्व जिहादी आतंकवाद वाढतो आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे रान माजले आहे. ह्या भारतमातेचा गळा हळू हळू आवळला जात आहे. बाकीची राष्ट्रे ह्या भारताला धमकावीत आहेत. ह्या भारतमातेच्या रक्षणाचा विचार कोणी करतो आहे का? सर्वच आपल्या सुखाच्या डोहात डुंबत आहोत. भारतावर कितीही अस्मानी सुलतानी संकटे आली तरी आपण हार मनात नाही. म्हणूनच अन्याय, भ्रष्टाचार, आतंकवाद, जातीयवाद अशा प्रकारच्या सर्वांना दाबून टाकण्यासाठी थोडसं मागे वळून पहावे लागते. ह्यासाठी सुदृढ, शरीर व कणखर मनाची आवश्यकता लागते. योगाभ्यासामुळे मनाची ताकद वाढते. निर्णयशक्ती वाढते. दृढनिश्चयी व्यक्तिमत्व निर्माण होते. स्वातंत्र्यवीरांना सोनेरी अक्षरात लिहिलेला इतिहास वाचल्यावर अंगात धैर्य निर्माण होते. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या वीरांना आठवलं की अंगात स्फूर्ती निर्माण होते. मागे वळून इतिहासाचा शोध घेतल्यास आपणही गौरवशाली इतिहास लिहू शकू. त्यासाठी फक्त मागे वळून पहा.
चारुलता कुलकर्णी
जे एन ४/१४/१४, सेक्टर ९,
वाशी नवी मुंबई-४००७०३
दूरध्वनी क्र. २७६५२९९४
No comments:
Post a Comment