या लेखाचे प्रयोजन काय, असा प्रश्न प्रथम वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. पुष्कळदा वरवर विचार करणाऱ्यांना ‘मनुस्मृती’ हे त्याचे कानीकपाळी सतत पडणारे कारण पटेल. स्त्रियांना दुय्यम स्थान मनुने दिले असा सर्वत्र प्रचार होत असतो. त्यात कितपत तथ्य आहे? ‘न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति’ हे त्याचे वचन त्यासाठी पुढे करण्यात येते. त्या वाक्याचा चुकीचा अर्थ नेहमी लावण्यात येतो. स्त्रिया स्वातंत्र्याला पात्र नाहीत असा त्याचा अर्थ नाही. प्रथमपासूनच अगदी आजच्या काळात सुद्धा खेड्यात काय आणि शहरात काय, सर्वसामान्यपणे स्त्रीचे जीवन धोक्याचे आहे. म्हणून स्वतंत्रपणे वावरणे हे स्त्रियांच्या दृष्टीने गैर आहे असा त्याचा अर्थ आहे. याच मनुने लिहिलेले दुरे वाक्य मात्र तथाकथित पुरोगामी सोयीस्कररीत्या विसरतात. ते वाक्य असे आहे “यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः“ म्हणजे जेथे स्त्रियांना सन्मान मिळतो तिथे देवतांचे वास्तव्य असते. हे लिहिणारा मनू प्रतिगामी होता काय? मुख्य गोष्ट म्हणजे हा मनू ब्राम्हण नसून क्षत्रिय होता. दुसरी गोष्ट – मनुने हे नियम बनविले नाहीत तर त्याचे संकलन केले. नियम आधीपासूनच अस्तित्वात होते. काळाच्या ओघात त्या त्या काळाच्या गरजेनुसार अनेक स्मृती निर्माण झाल्या. उदा. देवल स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती इ. द्यानार्जनाच्या बाबतीत पुरातन काळातही गार्गी, मैत्रेयी, सुलभा अशा ब्रह्मवादिनी होत्या. म्हणजे त्याही त्या वेळच्या पुरुषांच्या तुलनेत बुद्धिमत्तेत कमी नव्हत्या. दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ति म्हणजे जगातील कर्तृत्ववती स्त्रिया (भल्या-बुऱ्या) पुरुषनिरपेक्ष झाल्यावरच मोठ्या झाल्या. उदा. मेधा पाटकर, हिलरी क्लिंटन, मदर तेरेसा, तस्लिमा नसरीन, ऑंग सान स्युई, मार्गारेट थॅचर, सिरिमाव बंदरनायके, बेनझीर भुत्तो, मायावती, ममता, मीराकुमार, सुचेता कृपलानी. या आधुनिक काळातील तार सोडाच, पण ऐतिहासिक काळातही मातोश्री जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची उदाहरणे पहा. या सर्वांनी स्वतंत्रपणे कर्तृत्व गाजविलेले आहे. श्रीमत आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्या वादात अध्यक्षपदी मंडणमिश्राची सुविद्य पत्नी सरस्वती होती आणि मुख्य म्हणजे तिने शंकराचार्यांच्या बाजूने निर्णय दिला. स्वर्गातून निघालेल्या गंगानदीचा प्रवाह इतका जोरदार होता की भगवान शंकरांना तो मस्तकी झेलावा लागला. इतरांत ती शक्ती नव्हती. बहिणाबाई चौधरींची गाणी सर्वसामान्य खेडवळ भाषेतील रत्नांची खाण आहे. अडाणी कालिदासाची निर्भत्सना करून त्याला महाकवी या पदवीस पोहोचविण्यास त्याची पत्नीच कारणीभूत ठरली.
आजच्या जगात जरा डोळे उघडून पहा. सैनिकी शिक्षण, वैमानिक, एस. टी., रेल्वे मोटरमन, गिर्यारोहण, सहली आयोजन संस्था, पोस्ट ऑफिस, बँका, इन्शुरन्स कंपन्या, जलतरण स्पर्धा, जागतिक राजकारण, कुष्ठरोग निवारण, आता तर स्त्रियांची स्वतंत्र दहीहंडीही असते. (गोपिकांची). या सर्व बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. निसर्गाने स्त्रियांवर मातृत्व लादले आहे. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत अनेक दिव्यातून स्त्रियांना जावे लागते. तो त्यांचा पुनर्जन्मच असतो. इतकेच नव्हे तर मूल तीन वर्षांचे होईपर्यंत त्याचा आहार विहार, विकार इ. नोकऱ्या करूनही त्यांना सांभाळावे लागतात. मला अशी उदाहरणे माहित आहेत की दोघे कामावरून दमून आल्यावर, बायकोला एक कप चहा करून देणेसुद्धा नवरोबा टाळतो. या गोष्टींना क्वचित अपवाद असतीलही पण ते शेवटी अपवादच आहेत. ही गोष्ट केवळ भारतातच नाही तर सर्व जगात आहे.
आता अन्य क्षेत्रात मोठी असलेली माणसे कशी संकुचित विचारांची असतात हे पाहू. रामदास स्वामी ‘सावधान’ म्हणताच लग्नमंडपातून पळून गेले. जर त्यांचा पिंड वैराग्यशील होता तर ते मुळात बोहल्यावर उभेच का राहिले? ते पळून गेल्यावर त्यांच्या नियोजित वधूचे काय झाले? त्या काळी तिचा पुन्हा विवाह जमणे शक्य नव्हते. म्हणजे सक्तीचे ब्रम्हचर्य तिला पाळावे लागले असणार! श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘नवसे पुत्र होती तर का करणे लागे ‘पती’? पण दुसरी बाजू त्यांनी सांगितली नाही. ‘नवसे पुत्र होती तर का करणे लागे ‘पत्नी ’? हे त्यांनी म्हटले नाही. नवस पुरुषही करतात. आचार्य विनोबांना एकदा काही तरुण मुली भेटावयास गेल्या. तेव्हा त्यांनी रोडसाइड रोमिओंच्या त्रासाबद्दल सांगितले. तेव्हा विनोबांनी त्यांना या त्रासास ‘Eve Teasing‘ का म्हणतात याच्यावर एक प्रवचन ऐकवले. ‘Eve‘ म्हणजे Evening चा शॉर्टफॉर्म आणि Eve म्हणजे आदम आणि ईव्ह मधली Eve हा सर्व त्या संदर्भात अप्रयोजकपणा नव्हता का? फाळणीच्या आसपास गांधीजी नौखालीत शान्तिप्रस्थापानेसाठी गेले, तेव्हा त्यांनी आपले ‘ब्रह्मचर्याचे प्रयोग करण्यासाठी विवस्त्र अवस्थेत (म्हातारपणी) आपल्या तरुण नातीशेजारी’ झोपणे पसंत केले. त्या तरुण मुलींवर याचा विपरीत परिणाम झाला नसता का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी सौ. यमुनाबाई त्यांच्या शेवटच्या आजारात रुग्णालयात अत्यवस्थ होत्या. आपण आता थोड्याच दिवसांच्या सोबती आहोत हे लक्षात आल्यावर आपल्याला रुग्णालयातून घरी न्यावे व आपल्याला आपल्या घरीच सावरकर सदनातच मृत्यू यावा अशी त्यांची शेवटची इच्छा होती. पण ही साधी इच्छाही पुरी करण्याचे सावरकरांनी नाकारले आणि रुग्णालयातच त्यांचा मृत्यु झाला. आधी एकदा भेटून गेल्यावर सावरकर पुन्हा त्यांना रुग्णालयात भेटावयासही गेले नाहीत. अशी ही मोठी माणसे!
भारतात संतपरंपरेतही मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई अशा अधिकारी स्त्रिया होऊन गेल्या. दुसरी एक विचित्र गोष्ट म्हणजे पतीचे निधन झाल्यावर पत्नीने स्वखुशीने किंवा सक्तीने सती जाणे. ही अतिशय दुष्ट चाल होती. (जिवंतपणी अग्निप्रवेश) त्याचे आणखी एक कारण होते. समाजाच्या त्या काळच्या अवस्थेत विधवा स्त्रियांना सुरक्षित वाटत नसे. त्याहीपेक्षा वाईट चाल म्हणजे त्यांना देवदासी, भाविणी बनवून देवालयाचे पावित्र्य नष्ट करणे. संत कान्होपात्रेचे उदाहरण यासाठी पुरेसे ठरावे. तसेच नेभळट अशा रजपूत राजांनी (मानसिंग) मानमरातब, खासदारकी मिळविण्यासाठी अकबरासारख्या व्यसनी (चांदणी चौकातील मिनाबझार) बादशहांना आपल्या बहिणी देणे. (त्यांच्या इच्छेविरुद्ध) आधुनिक काळातही सिनेमा नाटकातल्या नटीचे खासगी आयुष्य कसे असुरक्षित असते हे रोजच्या वृत्तपत्रातून समजते. ‘नाटकशाळा’ हा शब्द का रूढ झाला हे स्पष्ट आहे. आता जरा पौराणिक काळाकडे वळू. प्रभुरामचंद्रांनी सीतादेवीसारख्या साध्वीला अग्निदिव्य करायला लावले आणि त्यानंतरही क्षुद्र धोब्याच्या बोलण्यावरून गरोदर अवस्थेत तिला अरण्यात पाठविले. सुदैवाने तिला वाल्मिकीसारखे थोर ऋषी भेटले म्हणून बरे. तिनेही शेवटी लवकुशांना जन्म देऊन मोठे केल्यावर रामासमक्षच धरणीच्या पोटात शेवटचा आश्रय घेतला. आता कुंतीचे उदाहरण! कुंतीने ऋषीची मनोभावे सेवा केल्यावर तिच्या अल्लड वयाचा विचार न करता ऋषीने तिला सूर्य, इंद्र, इत्यादींचे वर दिले आणि उत्सुकतेपोटी वरमंत्रांचा स्वीकार केल्यावर तिला कौमार्यातच मातृत्व प्राप्त होऊन पुढे कर्णाची शोकांतिका आणि महाभारत घडले. ज्ञानी म्हणवणाऱ्या त्या ऋषीला हे कळत नव्हते का? दुसरे असेच एक ऋषी (पराशर) मत्स्यगंधेबरोबर रममाण होऊन नंतर तिच्या भावी आयुष्याचा विचार न करता ‘साद देती हिमशिखरे’ म्हणत हिमालयात तपश्चर्येसाठी (पापक्षालनासाठी!) निघून गेला. आणि पुढे व्यासाचा जन्म आणि महाभारत घडले. (शंतनू, भीष्म इ.) आणखी एक विचित्र प्रथा म्हणजे भीष्मांनी युद्धात राजांचा पराभव करून त्यांच्या बहिणी, लेकी (त्यांच्या इच्छेचा विचार न करता) विचित्रवीर्य, आंधळा धृतराष्ट्र यांच्या गळ्यात बांधावयाच्या (गांधारी, अंबा, अंबिका, अंबालिका ही उदाहरणे पुरेशी ठरावीत.) द्रौपदीला स्वयंवरात मत्स्यभेद करून अर्जुनाने जिंकले होते. मग त्याच्याशीच तिचा विवाह न करता पाच पांडवांच्या गळ्यात तिला का बांधले? तिची या गोष्टीला संमती असणेच शक्य नव्हते. कारण द्रौपदीसारखे दुसरे उदाहरणही नाही. पतीचे निधन झाल्यावर जर प्रेमाखातर तिने सती जायचे तर मग प्रेमाखातर एकही पुरुष ‘सती’ (सता) गेला नाही हे कसे? उलट तो पुन्हा विवाह करी. हा कुठला न्याय?
माझ्या माहितीतील काही उदाहरणे विचित्र आहेत. पूर्वी वैद्यकीय योग्य आणि त्वरित उपचाराअभावी स्त्रिया बाळंतपणात मरत असत. पुन्हा पुन्हा लग्न करण्यास पुरुषास मोकळीक (अपत्यप्राप्तीसाठी). यात घर सांभाळणाऱ्या सासूचा काही दोष नसे. पण तिलाच ‘सूनमारी’ म्हणून संबोधण्यात येई. आधुनिक विचारांचा वारा लागलेले एक उदाहरण मला माहित आहे की, बायकोला लागोपाठ तीन मुळीच झाल्यावर पुत्र व्हावा (वंशवृद्धी आणि स्वर्गप्राप्तीसाठी) म्हणून त्या माणसाने पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध समागम करावयास लावला. हा एक प्रकारे कायदेशीर ‘बलात्कार’च नाही का? मेनकेकडून तपोभंग झाल्यावर तिच्यापासून झालेल्या ‘शकुंतलेला’ विश्वामित्राने डोळ्यावर आडवा हात ठेऊन वाऱ्यावर सोडले. बिचाऱ्या कणव ऋषीला तिचे संगोपन करावे लागले. पुढे त्यांच्याच आश्रमात येऊन तिला भुलवून तिच्याशी गुप्तपणे विवाह करून दुष्यंत आपल्या राजधानीला निघून गेला. पण पुढे तिची काहीच विचारपूस त्याने केली नाही. अंगठी हरविणे इ. भ्रामक कथा कालिदासाने आपल्या नायकाचा ढोंगीपणा लपविण्यासाठी रचल्या आहेत. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी राम वनवासाला गेला. पतिव्रता म्हणून सीताही त्याच्या मागोमाग निघाली. वास्तविक लक्ष्मणाला बरोबर जाण्याचे तसे काही कारण नव्हते. बरे, जायचेच होते तर उर्मिलेलाही बरोबर घेऊन जायचे. सितेलाही तिची सोबत वनवासात झाली असती. वाटले तर privacy साठी शेजारी शेजारी झोपड्या बांधून राहावयाचे. तसे केले असते तर पुढचे सगळे रामायण झालेच नसते आणि मंदोदारीलाही रावणाला कह्यात ठेवणे सोपे झाले असते. बिचाऱ्या शूर्पणखेचे नाकही शाबूत राहिले असते. बिभिषणावरही फितुरीचा आरोप आला नसता आणि बिचारे कुंभकर्ण, इंद्रजित सुखाने राहिले असते. हनुमानाला द्रोणागिरी उपटून आणावा लागला नसता आणि सुषेण वैद्याला आपले ज्ञान पणाला लावावे लागले नसते. माझ्यासारख्या सामान्य लेखकाला हे सुचते, तर त्या काळातील मोठमोठ्या विद्वानांना ही साधी गोष्ट कशी सुचली नाही याचे खरोखर फार आश्चर्य वाटते. आधुनिक काळात लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, साने गुरुजींची ‘श्यामची आई’, श्री. न. पेंडसेंच्या ‘गारंबीचा बापू’, ‘तुंबाडचे खोत’ अशा नवे बदलून लिहिलेल्या कादंबऱ्यातूनही तत्कालीन स्त्रियांची असहायता दिसून येते. चि. वि. वैद्यांच्या पेशवेकालीन ‘दुर्दैवी रंगू’ कादंबरीत हीच दृश्ये दिसतात. ‘मस्तानी’चा घरच्याच लोकांनी केलेला छळ (केवळ तिचे थोरल्या बाजीरावावर निस्सीम प्रेम होते म्हणून) आकलनापलीकडील आहे. आधुनिक काळात डॉ. आनंदीबाई जोशींनी अमेरिकेत जाऊन पदवी संपादन केली. नंतर त्या भारतात आल्यावर आजारी झाल्या. पण त्या केवळ परदेशी जाऊन ‘बाटल्या’ म्हणून पुण्यातील ‘भीषग्वर्यांनी’ त्यांच्यावर उपचार करण्याचे नाकारले आणि त्या वारल्या. एक सावित्रीबाई फुले यांचे उदाहरणच अपवाद आहे.
वरील सर्व लिहिण्यामागे कोणाचाही अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाही. मी ज्या घटना मांडल्या आहेत त्या इतरांनाही माहित आहेत. मी फक्त त्यात विशिष्ट संगती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आता यापुढे आधुनिक काळातील स्त्रियांवरील अन्यायाच्या काही सत्यकथा मांडणार आहे. मात्र खरी नवे ण सांगता त्या वेगळ्या नावाने लिहिणार आहे. (कारण त्यांच्या खऱ्या नावांच्या उल्लेखामुळे कोणालाही मनस्ताप होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.)
१) वेडाबाई मोलकरीण – या बाईला वेडाबाई नाव कोणी ठेवले त्याला अतिशहाणाच म्हटले पाहिजे. खरे तर तिच्या इतकी शहाणी बाई (न्हावी जातीची) मी क़्वचितच पहिली आहे. तिचे मूळ नाव लक्ष्मी होते. तरुण वयातच ती विधवा झाली. तिला बायजा नावाची मुलगी होती. जावई आळशी होता. काही कामधंदा करीत नसे. त्याला चार मुलगे होते. मोठा अंबाबाईचा भगत होता. त्याचे नाव पंड्या. दुसरा दसऱ्या, तिसरा मोत्या, चौथा बारक्या. मोठ्याला बायको होती. ती बुद्धीने जरा अर्धवट होती. वेडाबाई बिचारी चार घरी धुणी, भांडी, दळण, मोलमजुरी करून या सगळ्यांचा संसार चालवीत होती. न्हावी जातीची असूनही अंघोळ (गार पाण्याने) केल्याशिवाय तोंडात पाणी घालत नसे. चार घरे एकमेकांपासून लांब होती. पण पायी चालण्याशिवाय उपाय नव्हता. माझ्या लहानपणी तर मी तिला घरातलीच एक समजत होतो. लहान मुलांच्या दुखण्यावर तिच्याजवळ घरगुती स्वस्त उपाय होते. हे सर्व असूनही गर्व किंवा आदळआपट नव्हती. काळाच्या ती फार पुढे होती. स्वतः चार बुकेही शिकली नसली तरी शिक्षणाचे महत्व ती जाणून होती. ब्रिटिशांच्या त्या काळात (धुळ्यासारख्या ठिकाणी) तिने पंड्या सोडून बाकीच्या चौघांना व्हर्नाक्युलर फायनल (व्ह.फा.)परीक्षा द्यावयास लावल्या. मागास जातीचे असल्यामुळे त्या नातवंडांना कलेक्टर ऑफिस, सिव्हील कोर्ट, पोलीस खाते, वाहतूक खाते या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. त्यांची लग्नेही झाली आणि नंतर वेडाबाईला तिच्या उतार वयात पतवंडेही झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे तिची नातवंडे तिचा त्याग आणि शहाणपण ओळखून होते. म्हणून तिच्या नातसुनाही तिच्याशी प्रेमळपणे वागत. आयुष्याची तिची अखेरची वर्षे खूप समाधानात गेली. आपली आजी आपल्याकडे राहावी म्हणून तिच्या नातवंडात भांडणे लागत. शेवटी वर्षभरात तीन तीन महिने ती एकेका नातवाकडे राहत असे. तिला ते कामाला हात लावू देत नसत. आपल्या जुन्या कामांच्या ठिकाणी भारी इरकली लुगडे नेसून ती जाऊन आली. मला म्हणाली, भाऊ, देवाने माझे गाऱ्हाणे ऐकले. मी आता समाधानी आहे. त्याने मला आता केव्हाही न्यावे. मी तयार आहे. धन्य ती शहाणाबाई!
२) माझ्या ओळखीच्या एका घरी अंबिका म्हणून एक विधवा बाई राहत असत. त्यांचा विवाह बालपणीच (१५-१६ वर्षे). त्यांच्याहून जवळ जवळ २२-२३ वर्षांनी मोठ्या माणसाशी करण्यात आला. ते गृहस्थ लौकरच वारले. त्यावेळी विधवा विवाहाची प्रथा नव्हती. त्यामुळे अंबिकाबाईंना पुढचा सारा जन्म नातलगांच्या आधारे त्यांच्या त्यांच्या कामात मदत करून काढावा लागला. व्यक्तिगत आवडी निवडी बाजूला ठेवाव्या लागल्या. कोकणातल्या माहेरच्या माणसांनीही त्यांच्याकडे पाठ फिरविली. चार यत्ता शिकल्या असल्यामुळे निदान लिहिता वाचता तरी येत असे. वाचून वाचून त्या बुद्धिबळे खेळण्यास शिकल्या. पुढे इतरांच्या मदतीने त्या पत्त्यांचे ब्रीजसारखे खेळ शिकल्या. बॅडमिंटनसारखे खेळही शिकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कालांतराने असाध्य विकार होऊन त्या वयाच्या साठीत वारल्या. उत्तरेस काशीयात्रा करण्याची त्यांची इच्छा मात्र दुर्दैवाने अपुरीच राहिली.
३) विदर्भात एके ठिकाणी माझ्या ओळखीच्या एक महिला होत्या. त्याकाळी व्हर्नाक्युलर परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यात त्यांना गती होती. वाचनही चांगले होते. त्या (यमुनाबाई) आम्हाला सेक्सटन, ब्लॅक टायगर, टींकर यांच्या डिटेक्टीव गोष्टी रंगवून सांगत असत. त्यांचा विवाह एका हुशार वकिलाबरोबर झाला होता. पण ते १९३०च्या गांधीजींच्या चळवळीत गेले आणि पोलीस लाठीमारात त्यांच्या मेंदूला धक्का बसून ते ठार वेडे झाले. यमुनाबाईंचे आयुष्यच बदलून गेले. आयुष्यभर त्यांना आणि वृद्ध सासऱ्यांना त्यांना सांभाळावे लागले. त्यांच्या धाकट्या वकील झालेल्या दिरांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. सासरे आणि पतीच्या निधनानंतर काही वर्षांनी त्या आजारपणात गेल्या. त्यावेळी आपल्या अंतकार्यासाठी त्यांनी पाचशे रुपये ठेवले होते. गावातील सुशिक्षित घरातील मंडळींनी त्यांचे अंत्यविधी केले. शिकलेल्या असल्यामुळे लिहिण्या वाचण्यात तरी त्यांचा वेळ जात असे.
माझ्या ओळखीच्यापैकी एक कर्तृत्ववान महिला कोकणातील खेड्यात बरेचसे आयुष्य गेल्यामुळे लिहिण्या वाचण्यास शिकू शकल्या नाहीत. दीर्घायुष्य लाभूनही साध्या करमणुकीपासून त्या वंचित राहिल्या.
माझ्या ओळखीच्या आणखी एक घरातील मुलगी इंदिरा मेट्रिक, इंटर आर्टस, हिंदी कोविद झाली. एका डॉक्टरांशी तिचा विवाह झाला. पण पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी शक्यता असूनही त्यांना शाळेत शिक्षिकेचा व्यवसाय करता आला नाही. मोठ्या घरात त्यांचा जन्म रांधा, वाढा उष्टी काढा’ अशा कामातच गेला. सासर माहेरच्या लहान मोठ्या आप्तांसाठी त्यांचे घर म्हणजे अंगण-ओसरी होते. कोणाच्याही घरात लहान मोठ्या मंगलकार्यात त्या कधी दुर्मुखलेल्या नव्हत्या. त्यांचे निधन झाल्यावर शेजारपाजारच्या मुलींनाही अश्रू आवरले नाहीत.
आता मी हळू हळू लेखाच्या शेवटाकडे येत आहे. यात मला मनात सतत टोचणाऱ्या विषयाचा विचार केला आहे. या सर्व सत्यकथा आहेत. पण अर्थातच नावे बदलली आहेत. (कारण उघड आहे) त्या त्या व्यक्तींच्या सध्या विद्यमान असलेल्या लहान मोठ्या आप्तांच्या भावना दुखवू नयेत हा त्याचा हेतू आहे. वाचकांना वरील सर्व मजकूर पटेल, आवडेल असा विश्वास वाटतो. लेख प्रसिद्ध झाल्यास, संपादक महोदयांना आपल्या अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात, मी आभारी होईन. अस्तु !
No comments:
Post a Comment