Sunday, October 2, 2011

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य-डॉ. वि. वा. देशपांडे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यात देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यात क्रांतीचे ओज आहे नी आवेश आहे. त्यामुळे एखादे देशभक्तीपूर्ण ओजस्वी काव्य ऐकले की ते त्यांचेच असणार अशी ऐकणाऱ्याची खात्री असते. येथे माझा एक अनुभव सांगून मी हे सुस्पष्ट करतो. त्यावेळी मी जयपूरला एका संघटनेच्या कार्यक्रमास गेलो होतो. कार्यक्रमानंतर एखादे मराठी गीत सादर करण्याचा आग्रह केला. मी गर्जा जयजयकार क्रांतीचा हे गीत सादर केले. त्यानंतर तेथील एक जण म्हणाला ह्या काव्याचा हिंदीत अनुवाद झाला आहे आणि आम्ही ते गीत म्हणत सत्याग्रह करत असू. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत आहे. त्यांचे बोलणे थांबवत मी त्यांना सांगितले की हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत नाही. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकरांचे गीत आहे. त्यावर दुसरा गृहस्थ म्हणाला की असे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय दुसरा कोणी लिहूच शकणार नाही. इतर सर्वांनी त्यास दुजोरा दिला आणि मी एकटाच पडल्याने लोकशाही पद्धतीप्रमाणे मला माझा पराभव मान्यच करावा लागला. सांगावयाचे तात्पर्य, स्वातंत्र्यवीर सावरकर हेच क्रांतीसूक्त लिहू शकतात. कारण ते त्यांचे बोल अनुभवाचे आणि असामान्य प्रतिभा निर्मित आहेत अशी त्यांची उदंड कीर्ती आहे. एका दृष्टीने पाहता तसे त्यांना वाटणे अगदी स्वाभाविकच आहे. सोपानदेव चौधरी एका कडव्यात म्हणतात,
अनुमान नको, अनुभूती हवी
असली कविता चिरकाल नवी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य असामान्य प्रतिभा आणि असामान्य अनुभव या दोन पायांवर ताठ उभे आहे. कविवर्य शंकर वैद्य यांना असे वाटते की स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि कुसुमाग्रजांची कविता देशभक्तीच्या जातकुळीची, मृत्युन्जायी जिद्दीची आणि अफाट कल्पनाशक्तीची आहे. डॉ. पंडितराव पवार आणि डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचेही तसेच मत आहे. आपण फार तर असे म्हणू शकतो की या दोन तात्यांच्या काव्यात साम्य असण्याचे कारण हे असावे की
सावरकरांच्या काव्याचा प्रभाव कुसुमाग्रजांवर असणार. दोघांचाही आशावाद जबरदस्त आहे. सावरकर सागरास आवाहन देऊन ऐकवतात की माझी मातृभू “कथिल अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला” तर कुसुमाग्रज म्हणतात, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल उठतील या ज्वालेमधुनी भावी क्रांतीचे नेते”. सावरकर जन्मजात देशभक्त नी जन्मजात कवी होते. त्यामुळेच सन १८९४ ला वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी माधवराव पेशव्यांवर ते काव्य रचू शकले. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकही त्यांचे बालवयातील थोर काव्य पाहून आश्चर्यचकित झाले. पण सावरकरांना अभिमान शिवला नाही. कारण बालवयात ज्ञानेश्वरी रचणारे ज्ञानेश्वर असू शकतात, त्या दृष्टीने स्वतःचे काव्य काही विशेष नाही असे त्यांना वाटे. पण त्यांच्या काव्याची झेप किंवा हनुमान उडी केवढी मोठी होती हे त्यांच्या जगन्नाथाचा रथ या कवितेवरून लक्षात येते. ते सूर्यनारायणालाच प्रश्न करतात – “महाराज अपुली कथा ना कुठे निघे स्वारी”
“दिक क्षितीजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता” ह्या कालपथाच्या अतूट उतरणीवरता” “मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी” या कल्पनाशक्तीला अथवा कल्पनाविलासतेला तोड नाही. खरेतर ते एक महाकवीच होते. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. व्यास, वाल्मिकी नी कालिदास यांच्या श्रेणीत बसू शकणारे ते महाकवी होते. केवळ आदराच्या भावनांमुळे हे लिहीत नाही. त्यांच्या विराट काव्याचे दर्शनाने कोणीही निष्पक्ष माणूस असेच म्हणेल. ही त्या काव्याची गुणवत्ता जेवढी मोठी होती तेवढेच त्यांचे काव्यही मोठे होते. अडीच हजारांपेक्षा अधिक कडव्यांचे गोमंतक काव्य आणि आठशेपेक्षा अधिक कडव्यांचे कमला काव्य असून कमला काव्याचा जन्म कारागृहाच्या भिंतीवर झाला हे मोठे आश्चर्यकारक वाटते. १९२२ साली त्यांनी विजनवासी नाव धारण करून ते प्रसिद्ध करविले. त्यात निसर्गाचे सुरेख वर्णन असून प्रियकर मुकुल शत्रूच्या हाती लागल्याने कमलाची ताटातूट त्यांच्या स्वतःच्या अनुभवासारखीच वाटते. साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांना हे काव्य त्यांना महाकवी पद देण्यास योग्य वाटते.
त्यांचे काव्य कधी पोवाड्यांचे तर कधी आरतीचे रूप धारण करते. त्यात विविधता आहे. त्यात रसांचीही विविधता आहे. देशभक्ती हा दहावा रस त्यात ओतप्रोत भरून “सागरा प्राण तळमळला” म्हणून तो कारुण्यपूर्ण शब्दांनी कधी प्रकट होतो तर कधी “हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” या पराक्रमी शब्दाने प्रकट होतो. पण त्यांच्या काव्याचा स्थायीभाव किंवा अंतरीचा भाव आहे देशभक्ती ! त्यांनी आपले सर्वस्व मातृभूमीला वाहियले आणि टी जाज्वल्य देशभक्ती आणि तिचे प्रखर तेज ज्या घुबडांना सहन होणे शक्य नव्हते त्यांनी त्यातील काही ओळी निषिद्ध मानल्या तर ते स्वाभाविकच होते.
स्वातंत्र्याचे स्तोत्र त्यांनी तारुण्यात १९०३लाच रचले. त्यातील संस्कृत शब्द, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे या शब्दामागील हिंदुतत्वज्ञान, गेयता, आवेश आणि मुख्य म्हणजे तुजसाठी जनन व मरण मानणारी देशभक्ती त्या काव्यात त्यांच्या काव्याच्या बिजाप्रमाणे असल्याचे जाणवते. वेदांती आणि वदती यासारखे यमक नी प्रास साधणारे शब्दालंकार आणि गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली या शब्दांतील अर्थालंकार मनाला मोहून टाकतात. हिंदूची व्याख्या करताना पुष्पभू आणि पितृभू हे जे शब्द वापरण्यात आले तेच शब्द तेच तत्वज्ञान काव्यात मांडण्याकरिता प्रियकर हिंदुस्थान या काव्यात १९०८ला प्रकट झाले. पुढे “सागरास” ही कविता १९०९ला ब्रिटनच्या किनाऱ्यांवर त्यांना स्फुरली.
स्वातंत्र्यवीरांचे काव्य त्यांची देशभक्ती गर्जणाऱ्या सागरास भरती आल्यासारखे वाटते. त्या सागराजवळ जावे आणि देशभक्तीच्या भावनेने ओलेचिंब व्हावे असे वाटते. त्यांचे जीवनच महाकाव्याचा विषय ठरावे असे भव्यदिव्य असल्याने व ते सारे काव्य त्यांच्या अनुभूतीचा अविष्कार असल्याने महाकवि विनायकाय नमः म्हणून कोणीही त्यांच्या पवित्र स्मृतीपुढे नतमस्तकच होईल. आजच्या कालानुरूप त्या देशभक्तीची जाणीव कुसुमाग्रजांनी करून दिली आहे. त्यांच्या चार ओळी उधृत करून हा लेख समाप्त करतो.
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

No comments:

Post a Comment