Sunday, October 2, 2011

जीवन निष्ठा आणि सावरकरांची कविता

सशत्र क्रांतीची वाटचाल करणाऱ्या सावरकरांचे ठायी साहित्य शारदेची उपासना करण्याची शक्तीसुद्धा तेवढीच उत्कट होती याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणूस काही मूल्ये आणि निष्ठा घेऊन जीवनाची वाटचाल करीत असतो. अर्थात प्रत्येकाची मूल्ये, निष्ठा वेगवेगळ्या असणार. सावरकर देखील याला अपवाद नव्हते. अंदमान सारख्या तुरुंगात असताना देखील त्यांच्या प्रतिभेने उत्तुंग भरारी घेतलेली दिसते. अशा गोष्टी वेड असल्याशिवाय होत नसतात. अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी तुरुंगात लेखन केलेले दिसते, पण सावरकरांच्या वाटयाला आलेल्या यातनामय तुरुंगवासात त्यांनी निर्माण केलेले काव्य केवळ अतुलनीय म्हणवे लागेल.
अगदी बालवयापासून तो जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत सावरकरांनी देशाचे स्वातंत्र्य हीच केवळ निष्ठा मानली. सर्वस्वाचा त्याग हे त्यांचे मूल्य होते. ते केवळ क्रांतिकारकांचे मुकुटमणीच नव्हते, तर ते तळमळीचे क्रियाशील समाजसुधारक होते. हिंदुधर्मातील कालबाह्य परंपरांवर त्यांनी केवळ शब्दानेच नव्हे तर कृतीने देखील असूड ओढले. तुम्ही-आम्ही सारे हिंदू हा विचार त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून मांडणारे ते आचारवंत होते. काव्याच्या माध्यमातून त्यांनी हा विचार प्रभावीपणे मांडलेला दिसतो. रत्नागिरीतील आपल्या स्थानबद्धतेच्या काळात हा कर्मयोगी सर्व जातीधार्मांची सहभोजने आयोजित करीत होता आणि त्या त्या प्रसंगी कवितेच्या माध्यमातून समरसतेचा विचार प्रवाहित करीत होता. त्यांनी आयोजिलेल्या अशा सहभोजनाच्या उपक्रमांचे कौतुक माननीय भाई माधवरावजी बागल, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले आहे. कोणताही कार्यक्रम असो हा सावरकर नावाचा सरस्वत आपली साहित्य शिल्पे घेऊन धावून जाई. आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमाप्रमाणेच काव्याच्या माध्यमातून देखील समाज मनाला जाग आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्यांच्या वाटयाला हालअपेष्टा, यमयातना आल्या. त्या त्यांनी सहन केल्या कारण स्वातंत्र्य हे त्यांचे मूल्य होते. या अपार कष्टात देखील त्यांच्यातला कवी जागा राहिला याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मायभूमी सोडून परदेशात असताना मायभूमीच्या दर्शनासाठी आक्रंदणारे त्यांचे मन आपल्याला त्यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या ‘सागरास’ या कवितेतील ओळीमधून दिसून येते. प्रत्येक वेळी ते गंभीरपणाच काव्यात व्यक्त करीत असत असे नव्हे. त्यांची ‘तारकांस पाहून’ वाचतांना त्यांचातल्या सर्जनशील कवीचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडापेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळातच सावरकरांची कविता शब्दबद्ध झालेली दिसते. याचे कारण त्यांची जीवननिष्ठा. स्वातंत्र्यही त्यांची निष्ठा होती आणि ते प्राप्त झाल्यावर त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. तारुण्यात ते स्वातंत्र्यासाठीच्या क्रांतिकारकांच्या प्रयत्नात अग्रेसर होते. १९३७ पर्यंत त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. अंदमानातल्या कारावास, रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ यांत देखील त्यांची कविता त्यांना सोडून गेलेली नाही. पण जे ध्येय उराशी बाळगले ते पूर्ण झाल्यावर ते समाधानी झालेले दिसतात. आपण जे व्रत स्वीकारले ते अंधपणाने नाही हे ते आपल्या कवितेतून स्पष्ट मांडतात. ते म्हणतात,
‘की घेतले न व्रत हे अम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने,
जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे‘
त्यांचा कुठेही संभ्रम नाही. त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची त्यांची तयारी होती. ते वाट चुकलेले वेडे नव्हते, तर स्वातंत्र्याचे वेड उराशी बाळगून वाट निर्माण करून चालणारे आचारवीर होते. त्यामुळेच त्यांच्या काव्यात कुठे निराशा झाकोळलेली दिसत नाही. उलट त्यात स्फूर्तीचे स्फुल्लिंगच विखुरलेले दिसतात.
स्वातंत्र्यपूर्व कालापेक्षा स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यांच्या देशप्रेमाबद्दल, त्यागाबद्दल, निष्ठेबद्दल शंका घेण्यात आल्या. त्यांना मानहानीला तोंड द्यावे लागले. या स्वातंत्र्यवीरांची अवहेलनाच करण्यात आली. याचे त्यांना मनस्वी दु:ख झाले असणार. परंतु त्या दु:खाला मनातच बंदिस्त करून त्यांनी कवितेचा निरोप घेतला असावा असे वाटते. देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या या महाकवीने आपल्या मानहानीला, उपेक्षेला शब्दबद्ध केले नाही, यांतच त्यांचे मोठेपण दडलेले दिसते. सावरकरांनी देशासाठी केलेल्या त्यागाला इतिहासात तोड नाही. देशभक्ती हा त्यांच्या साहित्याचा पाया आहे. जेव्हा त्यांच्या बंधूंना अटक, शिक्षा झाली तेव्हा ते म्हणतात,
‘हे काय बंधू असतो जरी सात आम्ही,
त्वस्थंडीलीच दिधले असते बळी मी’
हे सांगताना देखील ते पुराणकथेचा दाखला देऊन यशाची खात्रीच देत असावेत असे वाटते. श्रीकृष्ण हा वसुदेवाचा आठवा पुत्र. त्यानेच दुष्ट्प्रवृत्तीचा नाश केला. कंसाचा संहार केला. त्याप्रमाणे ब्रिटीश सत्तेचा संहार करण्यासाठी आपले सात बंधू असते तार ते ही या कमी दिले असते, असे त्यांना नमूद करावयाचे असावे असे वाटते. म्हणजे सातत्याने अंगीकृत कार्याचा त्यांना कधीच विसर पडलेला दिसत नाही. त्यांची जीवननिष्ठा प्रबळच होती.
सावरकरांची कविता विविध रंग घेऊन अवतरते. त्यांत राष्ट्रभक्तीचे आवाहन आहे. स्वातंत्र्याचा हुंकार त्यातून ऐकू येतो. इतिहासाच्या मागोव्याबरोबरच भवितव्याचा वेध घेण्याची क्षमता त्यात आहे. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणां मिळाले?’ असं मत ठाम करून हा क्रांतिकारक योदधा, प्रेमाची तरलता तितक्याच प्रभावीपणे मांडताना दिसतो, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यांनी कवितेचे वेगवेगळे प्रकार हाताळताना पोवाड्याकडे पण तितक्याच तन्मयतेने लक्ष दिलेले दिसते.
‘तोफेआधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला’ असं ठामपणे सांगणारा बाजीप्रभू ते प्रभावीपणे मांडतात. बाजीप्रभूच्या त्यागाची महती गातानाच ते जनसामान्यांच्या ह्रिदयाला हात घालतात आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्यज्योत प्रज्ज्वलित करतात. ते त्यांच्या जीवननिष्ठेमुळेच होय ! त्यांनी रचलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती तार स्फुरण देणारीच आहे.
जॉन मिल्टन या कविप्रमाणे स्वा. सावरकरदेखील आपल्या देशवासियांना या आपल्या स्वातंत्र्यासाठी, सामाजिक समता, समरसतेसाठी कटिबद्ध होण्याचा मंत्र देत म्हणतात, ‘Awake, arise or be ever fallen.’ परंतु त्यांना ‘be ever fallen’ ही मिल्टनची कल्पना मान्य नाही. हा कर्ममार्गावरचा पांथस्थ निराशेने वा शंकेने कधी ग्रासला असावा असे दिसत नाही. त्यांना वाटते, ‘awake, arise and be successful.’
त्यांना मृत्यूचे भय कधीच नव्हते. ते यमयातना सोसताना देखील कंटाळून गेले नाहीत. मृत्यूचे छायेत असताना देखील आणि अंदमानच्या काळकोठडीतून समोर वधस्तंभ रोज दिसत असताना देखील मृत्यू त्यांना शिवू शकला नाही. शेवटी त्यांनीच मृत्यूला बोलाविले आणि प्रायोपवेशन करून मृत्यूला कवटाळले. ते नेहमी म्हणत, ‘अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला.’
तुरुंगात लेखनासाठी कसलेही साहित्य उपलब्ध नसताना केवळ पाठांतराच्या बळावर आणि घायकुतीच्या काट्याने त्यांनी महाकाव्याची बैठक असणारी कविता लिहिलेली दिसते. त्यांच्या काव्यात साहित्य विचाराबरोबरच सामाजिक समतेचा, प्रबोधनाचा विचार देखील तितक्याच तळमळीने व्यक्त झालेला दिसतो. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर आणि अर्थपूर्ण आहे. त्यांच्या कवितेत आवेश आहे. आशयघनता आहे. त्यांची कविता चिंतनशील आहे. त्यांची कविता वीररस घेऊनच जन्मते. अर्थात प्रेमाची भावना व्यक्त करताना त्याची बैठक देखील विररसाचीच आहे असे दिसते. त्यांची कविता देशभक्ती घेऊनच जन्मते असे दिसते. त्यांच्या कवितेत महाकाव्याचे गुण दिसतात. त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये आणि जीवननिष्ठा त्यांच्या कवितेत साकारताना दिसतात हेच खरे.

डॉ. प्रल्हाद अ. कुलकर्णी
११, ‘यशोदा’, रत्नदीप सोसायटी,
माधवनगर रस्ता,
कुपवाड (सांगली) ४१६४२५
भ्रमणध्वनी ९०११२८६८४४.

No comments:

Post a Comment